उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दहावा होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दुखवटा संपेपर्यंत त्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्या तरी, या काळात कोणतेही हार, तुरा किंवा सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शोकाकुल वातावरणात साधेपणा आणि संवेदनशीलता जपण्यावर त्यांचा भर असणार आहे.
0 टिप्पण्या